महत्वाच्या बातम्या

 कुसुंबी आदिवासींच्या मोबदल्यातून २० टक्के रक्कम वसूल केल्याचा आरोप : दोघांविरुद्ध गुन्ह्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुसुंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांना माणिकगड सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यातून २० टक्के रक्कम धमकी देऊन वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारत कवडुजी आत्राम आणि आनंदराव मारू मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश कोरपना न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत विनोद कवडुजी खोब्रागडे यांनी गडचांदूर पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, ते १९९७ ते २०२१ या कालावधीत तलाठी म्हणून विविध ठिकाणी कार्यरत होते. २०१२ मध्ये जिवती येथे तलाठी म्हणून कार्यरत असताना कुसुंबी येथील आदिवासींच्या ६३.६२ हेक्टर जमिनीबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मागविली होती. संबंधित जमिनीचा वापर, भाडेपट्टा आणि खननाबाबतच्या परवानग्यांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केल्याचे जबाबात नमूद आहे.

खोब्रागडे यांच्या आरोपानुसार, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ९ सप्टेंबर २०२५ रोजी कुसुंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांकडून अंगठे घेऊन करार करण्यात आला. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री बुलडोझरच्या सहाय्याने कुसुंबी गावातील घरे पाडण्यात आल्याचा आरोप आहे. गावाचे पुनर्वसन व पुनर्स्थापना न करता ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कंपनीकडून १८ आदिवासींच्या खात्यात जमिनीच्या मोबदल्यापोटी कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे जबाबात नमूद करण्यात आले आहे. मात्र, भारत आत्राम आणि आनंदराव मेश्राम यांनी कंपनीकडून मोबदला मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मोबदला म्हणून कराराच्या एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही रक्कम न दिल्यास कंपनीसोबतचा करार रद्द करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू तसेच न्यायालयातून स्थगिती आणू, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

या पद्धतीने १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत १८ आदिवासींकडून विविध रकमा घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये सारजाबाई कोटनाके यांच्याकडून ८ लाख २० हजार, निळकंठ आत्राम यांच्याकडून ७ लाख ६० हजार, भिमा सिडाम यांच्याकडून ५ लाख, बापुराव जुमनाके यांच्याकडून ४ लाख ८६ हजार, तसेच इतरांकडूनही लाखो रुपयांची रक्कम घेतल्याचे नमूद आहे. एकूण सुमारे ८२ लाख ६६ हजार रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी यापूर्वी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याने खोब्रागडे यांनी कोरपना न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २९ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार भारत कवडुजी आत्राम आणि आनंदराव मारू मेश्राम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३१८(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानंतर गडचांदूर पोलिसांकडून पुढील तपासाची कार्यवाही सुरू झाली आहे.





  Print






Related Photos