वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी : विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना अनोखी गुरुदक्षिणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गुरुजनांप्रती कृतज्ञता, आदर आणि सन्मान व्यक्त करणारा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना टिळा लावून, नारळ व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच प्रेरणादायी गीते, भाषणे आणि सांस्कृतिक सादरीकरणातून गुरु-शिष्य परंपरेचा गौरव व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत मानकर, रजिया खान, प्राचार्य विजय शिंदे, शबिस्ता सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महत्त्वावर आधारित प्रेरणादायी गीते व भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शबिस्ता सय्यद यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करत जीवनात गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता अधोरेखित केली.
यावेळी प्राचार्य विजय शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिक्षक हा तो प्रकाश आहे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा मार्ग प्रशस्त करतो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सदैव आदर ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निहारिका हयारन यांनी केले, तर ज्योती अनिवर्ती यांनी आभारप्रदर्शन केले. सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
News - Chandrapur




Petrol Price




