प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी

- बेलसणी, भटाळी, उर्जानगर येथील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या
- नुकसान भरपाईबाबत शास्त्रीय पध्दतीने धोरण निर्माण करण्याची ग्वाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग तसेच कोल वॉशरीजमुळे निघणारी धूळ, हवेतील धुळीचे कण, कोल वॉशरीतून निघणाऱ्या प्रदुषित पाण्याचा मानवी जीवनावर तसेच शेतीव्यवसायावर होणारा परिणाम प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (१९) चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी बेलसणी, भटाळी, उर्जानगर या प्रदूषण ग्रस्त भागाची पाहणी करून पिडीत शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
शासनामध्ये काम करतांना धोरण, नियम, कायदा असणे महत्वाचे आहे, असे सांगून अपर मुख्य सचिव खारगे म्हणाले, प्रदुषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानभरपाईबाबत शासनाचे अधिकृत धोरण अथवा कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज चंद्रपूर येथे आलो. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदुषणाचा तसेच शेतीच्या नुकसानभरपाईचा मुद्दा शासनाकडे मांडला. त्यांच्याच प्रयत्नामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक दीर्घकालीन धोरण तयार होत आहे.
उद्योगांच्या प्रदुषणामुळे या क्षेत्रात समस्या नक्कीच आहे, शेतीचे नुकसान होत आहे, ही नुकसानभरपाई कोणी द्यायची, कोणत्या दराने द्यायची, कधीपर्यंत द्यायची, याबाबत शास्त्रीय पध्दतीने निर्णय घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) प्रतिनिधींची नियमितपणे बैठक घेण्यात येईल. चर्चा व अभ्यास करून शेतीच्या नुकसानभरपाईबाबत एक निश्चित धोरण तयार करून शासनाला अहवाल सादर केला जाईल. पिडीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वस्तुनिष्ठ पध्दतीने ही समिती काम करेल, अशी ग्वाही अपर मुख्य सचिव खारगे यांनी दिली.
उद्योगांपेक्षा अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्व जास्त : आमदार सुधीर मुनगंटीवार -
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या प्रदुषणामुळे शेतीचे तसेच नागरिकांच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उद्योगांपेक्षा अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्व जास्त आहे. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली शेतीच्या नुकसानभरपाई करीता शासनाने समिती गठीत केली आहे. विकास खारगे हे अभ्यासू, निष्ठावंत, संवेदनशील तसेच प्रामाणिक अधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा अनेक वर्षे होत राहील.
या अहवालात शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीचे धोरण (एमएसपी) अंतर्भुत असावे. एमएसपी बदलला तर नुकसानभरपाईची रक्कम वाढेल, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतीचे नुकसान, गावाचे पुनर्वसन, नोकरीत स्थानिकांना रोजगार, उद्योगासाठी शेतजमिनीचा योग्य भाव, आदी विषयांबाबत माहिती दिली.
या ठिकाणी दिल्या भेटी : या दौऱ्यात अपर मुख्य सचिव खारगे यांनी बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज मुळे होणारे प्रदुषण, भटाळी येथील वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे होणारा पुराचा धोका तसेच उर्जानगर येथील रोप-वे मुळे होणाऱ्या प्रदुषणाची पाहणी केली.
विविध विषयांबाबत आढावा बैठक : खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाशी संबंधित विषयांवर आढावा बैठक घेतली. यात नवीन गंगापूर (ता. पोंभुर्णा) महसूली दर्जा प्रदान करून संगणीकृत गाव नमुना सातबारा उपलब्ध करून देणे, मौजा पाहमी (ता. चंद्रपूर) हे गाव ग्रामपंचायत निंबाळाला जोडणे, झरी व पेठ ही गावे पिंपळखुट ग्रामपंचायतीला जोडणे, देवाडा व जुनोना ही गावे चंद्रपूर तालुक्यात समाविष्ट करणे या विषयांवर गावक-यांशी व संबंधित अधिका-यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदारद्वय सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




