मानवी नात्यातील गुंतागुंत अधोरेखित करण्याचा उत्तम प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नवोदिता चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या पुर्णविराम या नाटकाने स्पर्धेत गहीरे रंग भरले. आपलं प्रिय माणूस आजारी, बिछान्यावर अगतीक होवून पडलेलं, करूण आणि असहाय परिस्थीतीत जगवंत रहायचं की त्याचा आत्मसन्मान जपत त्याला मन घट्ट करून निरोप द्यायचा या दुविधेला हे नाटक वाचा फोडते आणि उत्तरही देते. इरफान मुजावर लिखीत या नाटकात मानवी नात्यातील गुंतागुंत भावनिक आंदोलनांच्या सोबतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनोहर, माधवी, अनिता आणि लकी या चार पात्रांभोवती फिरणारे हे कथानक जगणे आणि मरणे यातील धुसर सिमारेषा स्पष्ट करत मोठा संदेश देवून जाते. कॅन्सरग्रस्त मनोहर, त्याची बायको अनिता आणि प्रेयसी माधवी यांच्यातील भावनिक संघर्ष दिग्दर्शक प्रशांत कक्कड यांनी उत्तम साकारला आहे. एकमेकींहून पूर्णतः विरूध्द असलेल्या माधवी व अनिताचा प्रवास हळू हळू स्विकारापर्यंत जातो. स्विकारापर्यंतचा हा प्रवास दिग्दर्शकाने उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. हॉस्पीटलमधील आय. सी. यु. बाहेरील प्रतिक्षाकक्ष, मनोहरचे घर, माधवीचे घर असे तीन पातळयांवर सतिश काळबांडे यांनी साकारलेले नेपथ्य अनुरूप होते. संगीताची उत्तम जोड नाटकाला लाभली. मिथुन मित्र यांची प्रकाशयोजना प्रसंगानुरूप प्रभावी होती. मनोहरच्या भुमीकेत गौरव भट्टी यांनी उत्तम अभिनय केला. कल्याणी भट्टी आणि स्नेहल राऊत यांनी देखील उत्तम अभिनय करत नाटकाला देखणेपण बहाल केले. सुशांत भांडारकर यांनी उत्तम साथ दिली. प्रत्येक नव्या प्रारंभाचा प्रवास पूर्णविरामापर्यंत होतो. जन्माला येते ते मृत्युकडे झेपावते. एखाद्या जीवलगत नात्याचा प्रवास अर्धवट झाला, मध्येच हात सुटले किंवा पूर्णत्व प्राप्त झाले नाही, असे जेव्हा माणसाला वाटते तेव्हा खरे तर तो प्रवास तेवढाच होणार असतो हा स्विकार भावनिक आंदोलनांना हा स्विकार शांत करतो. याचा सुरेख प्रत्यय नवोदिताच्या पूर्णविराम या नाटकाने दिला. हे नाटक पारितोषीकांच्या मालिकेत अव्वल ठरते किंवा नाही हे निकालाअंतीच ठरेल.
News - Chandrapur