रिमझिम पावसाने उघड केली शहरातील निचऱ्याची समस्या : चर्च परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गेल्या दोन दिवसांपासून बल्लारपूर शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील बहुतांश मुख्य मार्गांवर वाहतूक सुरळीत सुरू असली, तरी बुधवारी दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील चर्च परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी पाणी साचल्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
विशेष म्हणजे शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर पावसाचे पाणी त्वरित वाहून जात असताना केवळ चर्च परिसरात पाणी साचल्याने स्थानिक नागरिकांनी निचरा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही काळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांनाही सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागले.
दुपारच्या सुमारास विविध शाळांची सुटी झाल्याने विद्यार्थ्यांना या मार्गाने जाणे धोकादायक ठरू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना पर्यायी मार्गाने घरी नेण्याचा निर्णय घेतला. लहान विद्यार्थ्यांना पाण्यातून चालणे टाळण्यासाठी पालकांची मोठी धावपळ झाल्याचे दिसून आले.
स्थानिक नागरिकांच्या मते, चर्च परिसरात दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे पाणी साचते. यामागे अपुरी किंवा अडथळाग्रस्त जलनिस्सारण व्यवस्था कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेने वेळेत गटारे व नाले स्वच्छ करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने चर्च परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




