पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४x७ अलर्ट मोडवर : नागरिकांना दोन दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंथा / मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय यंत्रणांना २४x७ अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी आज आणि उद्या अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह किनारी जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान उच्च भरती येण्याचाही अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात झालेल्या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांना सज्ज ठेवण्यात आले असून गरज भासल्यास मदत पथके त्वरित रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तातडीने दूर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गासह दरडप्रवण भागांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवून दरडीचा मलबा तात्काळ हटविणे आणि कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले
News - Rajy




Petrol Price




