महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा–आलापल्ली महामार्गाला मिळणार नवी गती : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या पाठपुराव्याला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सिरोंचा ते आलापल्ली (राष्ट्रीय महामार्ग ३५३-सी) या रखडलेल्या मार्गाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या या कामाकडे केंद्र सरकारने लक्ष वेधले असून, प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत केंद्र सरकारकडून संबंधित विभागांना तातडीने निर्देश देण्यात आले आहेत.

जनहितासाठी पुढाकार -
मागील अनेक वर्षांपासून खराब रस्ते आणि अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः आदिवासी बांधव, मोठ्या अडचणींचा सामना करत होते. आरोग्य सेवा, शिक्षण व रोजगाराच्या संधींवर याचा प्रतिकूल परिणाम होत होता.

ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. अशोकजी नेते यांनी १ एप्रिल २०२६ रोजी केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करून या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती.

केंद्र सरकारकडून तातडीचे निर्देश -
या निवेदनाची दखल घेत भारत सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने तातडीने पावले उचलली. मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (मुंबई) तसेच अधीक्षक अभियंता (नागपूर) यांना लेखी आदेश जारी केले. ७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांमध्ये या महामार्गाचे महत्त्व अधोरेखित करत, कामातील अडथळे दूर करून ते जलदगतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

विकासाची जीवनवाहिनी -
हा मार्ग केवळ रस्ता नसून या भागातील व्यापार, वाहतूक आणि सर्वांगीण विकासाची जीवनवाहिनी आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा विकास रखडू नये, हीच माझी भूमिका आहे, असे मत डॉ. अशोक नेते यांनी व्यक्त केले.

नागरिकांना होणारे फायदे -

या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर—
सिरोंचा ते आलापल्ली प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल
स्थानिक शेतमाल व व्यापाराला मोठी चालना मिळेल.
आरोग्य व आपत्कालीन सेवा वेळेत उपलब्ध होतील
दुर्गम भागातील विकासाला नवी दिशा मिळेल
आनंदाचे वातावरण 

जनहितासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घडामोड केवळ रस्त्याच्या कामापुरती मर्यादित नसून, गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos