बस बिघडली, पर्यायी बस नाही : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिनींना रस्त्यावर उतरावे लागले


- चामोर्शी–बोरी–गणपूर मार्गावरील बससेवेचा प्रश्न ऐरणीवर; विद्यार्थिनींची गैरसोय
विधर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नियमित आणि सुरक्षित वाहतूक सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक असताना, चामोर्शी–बोरी–गणपूर मार्गावरील एसटी बस बिघडल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचे मोठे हाल होत आहेत. या मार्गावर नियमित धावणारी बस बिघडल्याने विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बस बंद पडल्याची माहिती असूनही विद्यार्थ्यांसाठी पर्यायी बस उपलब्ध करून दिली जात नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एसटी बसवर अवलंबून असतात. बससेवा विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर आणि शिक्षणावर होतो. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे निर्माण होत आहे.
बस बिघडणे ही तांत्रिक अडचण असू शकते; मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था न करणे हा गंभीर प्रश्न आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाकडून घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात साध्या शाळेत जाण्यासाठीही विद्यार्थिनींना रस्त्यावर उतरून बसची वाट पाहावी लागत असेल, तर ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सामाजिक कार्यकर्ता सुरज पिपरे यांची मागणी -
चामोर्शी–बोरी–गणपूर मार्गावरील बिघडलेली बस तातडीने दुरुस्त करून नियमित बससेवा सुरू करावी. तसेच बस दुरुस्तीला वेळ लागणार असल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ पर्यायी बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुरज पिपरे यांनी केली आहे.
विद्यार्थिनींच्या शिक्षणात आणि सुरक्षिततेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी एसटी महामंडळ व संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सुरज पिपरे यांनी केली आहे.




Petrol Price




