महत्वाच्या बातम्या

 खरीप २०२६ पिकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू


- अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; गडचिरोलीतील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम २०२६ साठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून या स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

राज्यात दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या पिकस्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देण्याबरोबरच उत्कृष्ट उत्पादकतेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात येतो. अशा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

यापूर्वी पिकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविली जात होती. मात्र प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता, गतिमानता आणि सुलभता आणण्यासाठी खरीप हंगाम २०२६ पासून स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

यंदाच्या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धा होणार असून, सर्वसाधारण व आदिवासी या दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग क्षेत्र लागवडीखाली असणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठीही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक पासबुक किंवा धनादेशाच्या पहिल्या पानाची प्रत जोडणे आवश्यक आहे.

मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे. स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये, जिल्हा स्तरावर १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये, तर राज्य स्तरावर ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील पीक स्पर्धा नोंदणी या टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos