महत्वाच्या बातम्या

 आपत्ती काळात मूलभूत सुविधा व प्रशिक्षित मनुष्यबळाचे सुक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी वसुमना पंत


- जिल्हा आपत्ती व्यस्थापन व मान्सूनपुर्व तयारीचा आढावा

- विजेपासून बचावासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक मूलभूत सुविधा, साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी-२०२६ आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग,  महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे (सार्वजनिक बांधकाम), निलिमा मंडपे (मृद व जलसंधारण), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व विभागांनी उपलब्ध साधनसामग्रीचा साठा आणि त्यांची कार्यस्थिती तपासावी, असे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, जिल्हा तसेच तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणी करावी. धोकादायक इमारती, पूल व रस्त्यांची तपासणी करून तातडीने दुरुस्ती करावयाचे नियोजन करावे. आपापल्या क्षेत्रातील अवैध होर्डिंग्ज काढावीत आणि स्थानिक स्वयंसेवकांना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण द्यावे. आवश्यकतेनुसार एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथकांची तयारी, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण भागातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास मदत, पुनर्वसन, जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा पुरवठा तातडीने करण्यासाठी प्रशासन सक्षम राहील, अशा पद्धतीने सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, इरई तसेच इतर लहान-मोठ्या नद्यांमुळे काही गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष राहून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. जिल्ह्यातील आपत्ती पूरप्रवण गावात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक साहित्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पंत यांनी दिले.

विविध विभागांनी करावयाची कार्यवाही -
बैठकीत आरोग्य विभागाकडून औषधसाठा, सर्पदंशावरील उपचार आणि लसींची उपलब्धता, पोलीस विभागाकडून प्रशिक्षित मनुष्यबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते व पुलांची दुरुस्ती, जलसंधारण विभागाकडून नाले-बंधाऱ्यांची स्वच्छता व गाळ काढणे, लघु पाटबंधारे विभागाकडून धरणे व कालव्यांची देखभाल, महावितरण कडून वीजवाहिन्यांची तपासणी, चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रकडून साठवण्यात आलेल्या इरई धरणाच्या पाण्याचा निचरा व सुरक्षा व्यवस्थेची तपासणी, कृषी विभागाकडून बियाणे, खते आणि पेरणीपूर्व मार्गदर्शन तसेच जिल्हा प्रशासनाकडून निवारा केंद्रे, नियंत्रण कक्ष आणि पूरप्रवण भागांचे समन्वित नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तत्पूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मान्सूनपूर्व नियोजनाचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीला सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी दुरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos