चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा बळी : २१ वर्षीय गुराख्याच्या हल्ल्यात मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून सोमवारी १६ मार्च वाघाच्या हल्ल्यात २१ वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यावर्षी जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षात मृत्यू झालेल्यांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मामला वनपरिक्षेत्रातील चेक निंबाळा परिसरात राहणारा करण किसन शेडमाके (वय २१) हा गुरे चारण्याचे काम करत होता. सोमवारी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास तो बैल चारण्यासाठी शेताकडे गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बैलावर हल्ला केला. बैलावर झालेला हल्ला पाहून करणने आरडाओरडा केला. मात्र त्याच वेळी वाघाने करणच्या दिशेने झडप घालत त्याच्यावरही हल्ला केला. या भीषण हल्ल्यात करणचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गाठोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका येलमे तसेच वनरक्षक गुरु वरखेडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात वाढत असलेल्या वाघांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




